दुर्गराज रायगडच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीला नियमच लावले पाहिजेत का ? आपली नैतिक जबाबदारी आणि सामाजिक भान काही आहे की नाहीच ?
लग्नापूर्वी व लग्न झाल्यानंतर कित्येक जोडपी गडावर येत असतात, यामध्ये काही वावगे नाही. परंतु या व अशा इतर काही गोष्टींचे रूपांतर आता इव्हेंट मध्ये होत असल्याचे प्रखरतेने दिसून येत आहे. प्री व पोस्ट-वेडिंग शूट आणि तत्सम गोष्टी राजसदर व समाधीस्थळी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
दुर्गराज रायगड व त्यावरील सर्व वास्तू ही प्रेरणास्थळे आहेत, पर्यटनस्थळे नव्हेत ! सोशल मीडियावर प्रदर्शन करण्यासाठी राजसदर व महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी नाटकी व अनावश्यक गोष्टी करणे खरेच गरजेचे आहे का ?

रायगडावर खाजगी इव्हेंट सदृश फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे नियम अस्तित्त्वात आहेत, त्याची सक्त अंमलबजावणी करण्यात यावी, याबाबत पुरातत्व विभागास सूचना दिलेल्या आहेत. पण प्रत्येक गोष्टीला नियम लावण्यापेक्षा शिवभक्त म्हणून आपणही सामाजिक भान जपणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
